25) मुंबई शहर
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग पंचविसावा दिनांक :- 19 मे 2023 वार - शुक्रवार
25) जिल्हा - मुंबई शहर माहिती
★ मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ ६७.७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे.
★ जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे.
★ मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर.
★ मुंबई जिल्ह्यात एक ही तालुका नाही.
★ मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्यात विभागले गेले आहे.
★ मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून शीव/ माहिम पर्यंत आहे.
★ मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.
★ मुंबई ही भारतातील महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.
★ मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे.
★ मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभलेले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने ५०% मालवाहतूक होते.
★ मुंबई हा एक जिल्हा सुद्धा आहे. मात्र तिथे जिल्हापरिषद नाही.
★ मुंबई शहर हे त्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे.
★ वडापाव हा मुंबईचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.
★ ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली म्हणून मुंबईला सात बेटांचे शहर असे म्हटले जाते.
★ १९९५ मध्ये शिवसेनेची-भाजप युतीचे सरकार सत्तेत असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बेपासून मुंबई असे केले.
★ मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे.
★ रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत.
★ मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
★ मुंबई हे बॉलीवूड आणि मराठी सिनेउद्योगाचे केंद्र आहे.
★ बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
★ मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे.
★ पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले.
★ मुंबई, बम्बई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला मुंबापुरी म्हणतात.
★ घारापुरी हे मुंबईजवळील एक बेट आहे. याला एलिफंटा आयलंड असेही नाव आहे.
★ वाळकेश्वर मंदिर किंवा बाणगंगा मंदिर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे.
★ जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत.
★ मिठी नदी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्वाची नदी आहे.
★ मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे.
★ बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे.
★ मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते.
★ मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३६ आमदार करतात.
★ मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत.
★ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे.
★ मुंबईच्या बेस्ट बसेसमधून अंदाजे दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात.
★ मुंबई भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.
★ शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे.
★ मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे.
★ मुंबई विद्यापीठ यासह एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई मध्ये आहे.
★ ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत.
★ अजित वाडेकर, सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, अजित आगरकर, रोहित शर्मा,अजिंक्य रहाणे हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचे आहेत.
★ मुंबईच्या लोकांचा फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे.
★ मुंबईतील उपनगरे - वांद्रे, सांताक्रूझ, नाहूर, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, शीव, घाटकोपर, भांडुप, मुलुंड,विक्रोळी, दहिसर, खार रोड, विद्याविहार, कांजुरमार्ग, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर.
★ मुंबई जिल्ह्यातील पर्यटनस्थळे-
● महात्मा फुले मार्केट - क्रॉफर्ड मार्केटची इमारत ही मुंबईतील ब्रिटिश काळात जनतेच्या दैनंदिन गरजेसाठी बांधल्या गेलेल्या इमारतींपैकी एक आहे. त्याच्या मुख्य इमारतीवर घड्याळाचा उंच मनोरा असून त्यावरील घड्याळाचे टोले परिसरात ऐकू येण्यासाठी त्यात ६०० किलोग्रॅम वजनाची प्रचंड घंटा बसवण्यात आली होती.
◆ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.
● फ्लोरा फाउंटन/फ्लोरा-फाऊंटन - हुतात्मा चौक हा मुंबईच्या फोर्ट विभागातील एक ऐतिहासिक चौक आहे. या चौकाचे जुने नाव फ्लोरा फाउंटन असे होते.
● जहांगीर कलादालन - आर्ट गॅलरी
● छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय - छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, ज्याचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे होते. हे मुंबई येथील एक संग्रहालय आहे जे ऐतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करते.
● गेटवे ऑफ इंडिया - गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. त्याचे १६ व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बेसाॅल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे
● गेटवे ऑफ इंडिया ही इमारत दक्षिण मुंबईतील शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर आहे. ही इमारत शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे.
● मरीन ड्राईव्ह मुंबईतील एक रस्ता आहे. हा रस्ता मुंबई येथील नरीमन पॉईंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय आहे.
● मलबार हिल हे मुंबईतील एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आणि वसाहत क्षेत्र आहे. मुंबईतील सर्वात उंच निवासी ठिकाण म्हणून ह्याची ख्याती आहे. हे मुंबईतील उच्चभ्रूंचे आवडते निवासस्थान आहे.
● मणीभवन हे महात्मा गांधी आपल्या मुंबईतील वास्तव्यात ज्या इमारतीत राहात असत त्या इमारतीचे नाव आहे. आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालयही तेथे स्थापन करण्यात आले आहे.
● महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात तीन मुर्ती आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. धाक्जी दादाजी (१७६०- १८४६) ह्या हिंदू व्यापाऱ्याने १८३१ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोधार केला
● मुंबई शहरातील दक्षिणेकडील वरळी समुद्रकिनाऱ्यावरील लहानशा बेटावर अतिशय प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध ठिकाणी हाजी अली दर्गा (मशीद) आहे.
● श्री सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे प्रभादेवी, मुंबई येथे आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे.
● जुहू बीच - सायंकाळच्या वेळी लोकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें